तर्पण म्हणजे काय ? पितर म्हणजे काय ?
तर्पण म्हणजे काय ?*
——————————
श्राद्ध शब्दाची उत्पत्ती ‘श्रद्धा’ या शब्दापासून झाली आहे.
*पितृपक्षात श्रद्धेने पितर आणि पूर्वजांना केलेल्या पिंडदानामुळे ते संतुष्ट होतात. यालाच तर्पण असे म्हणतात.*
तर्पणाचा उद्देश पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा असतो. तसंच, त्यांना मुक्ती मिळावी हेही यामागचं एक कारण आहे.
पितृ शब्दापासून पितरची उत्पत्ती झाली आहे.
वाड-वडलांना त्यांच्या मुलांविषयी मोह वाटणं स्वाभाविक आहे. मृत्यूनंतरही मोहाचे बंध तुटत नाहीत. ब्रह्मपुराणानुसार यमराज श्राद्ध पक्षात पितरांना मुक्त करतात. जेणेकरून ते आपल्या वंशजांजवळ येऊन पिंडदान ग्रहण करतील आणि तृप्त होतील. मात्र, पितर तर सूक्ष्म शरीर आहे आणि आत्मा निर्विकार आहे. मग मायेचा मोह त्याला कसा काय विचलित करू शकतो? हे समजून घेण्यासाठी मनुष्याच्या मनात असलेली मूलभूत इच्छा समजून घ्यायला हवी. शास्त्रानुसार, आत्मा सर्वव्यापी आहे. आत्मा ज्या प्रकारच्या कर्मात लिप्त होतो, तसाचा माणसाचा स्वभाव बनतो. पुण्य कर्म केल्यानंतर त्याला पुण्यात्मा आणि पाप केल्यानंतर पापात्मा असं नाव दिलं जातं.
श्राद्धाच्या महिन्यात मृतात्मे आपल्या वंशजांद्वारा अर्पण केलेले श्राद्धातील पदार्थ ग्रहण करण्यासाठी प्रतीक्षेत असतात. पदार्थ ग्रहण केल्यानंतर ते संतुष्ट होतात.
*पिंडदानात जल आणि अन्न अर्पण केल्याने पितरांचे सूक्ष्म शरीर संतुष्ट होते. मात्र, त्यामागील श्रद्धा ही महत्त्वाची असते. त्यामुळंच पितरांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहतो. इच्छापूर्ती हा एक क्रांतिकारी क्षण असतो. यम-नचिकेता संवादामध्ये यम म्हणतो, ज्या क्षणी पितरांच्या अतृप्त इच्छा पूर्ण होतात, त्या क्षणी मृत्यूपंथाला निघालेल्या आत्म्यांना अमरत्व पारप्त होते आणि ते ब्रह्मात विलीन होतात. यालाच मुक्ती म्हणतात आणि या हेतूनेच तर्पण केले जाते.*
—————————– —–
*पितर म्हणजे काय ?*
—————————— ——
*मृत्यू पावल्यानंतर परलोकात गेलेले आणि तेथे वास करणारे पूर्वज म्हणजे पितर.*
सर्व मृतांना मरणोत्तर जीवन असते, अशी समजूत जगातील सर्वच धर्मात व समाजात प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे अशा पितरांचे स्मरण, पूजन करणे हे मानवधर्माचे एक मूलभूत व प्रमुख असे अंग बनले. हिंदू धर्मातील ऋणत्रयाच्या कल्पनेतही एक ऋण म्हणून पितृऋणाचा अंतर्भाव आहे.
*हिंदू कल्पनेनुसार पितर म्हणजे मृत पिता, पितामह आणि प्रपितामह त्याचप्रमाणे मृत माता, पितामही, प्रपितामही, मातामह, प्रमातामह, मातामही, प्रमातामही तसेच अन्य जवळचे मृत स्त्री-पुरुषसंबंधी. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात करावयाच्या महालय श्राद्धाच्याही संदर्भात वरील पित्याच्या आणि मातेच्या बाजूचे मृत आणि अन्य मृत कुटुंबीय, असा ‘पितर’ शब्दाचा अर्थ आहे.*
पहिला मृत मानव यम हा आद्य पितर आणि सर्व पितरांचा राजा असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. यम अंतरिक्षात वास करतो. अंतरिक्षातील देवतांच्या स्थानाच्या वर यमलोक असून, तोच पितृलोक होय. मृत पितरांचा वास याच लोकात असतो.
जीवात्म्याला मरणोत्तर सूक्ष्म भौतिक देह प्राप्त होतो. श्राद्धात दिलेल्या अन्नामुळे या देहाचे पोषण होते आणि त्याला उच्चलोक प्राप्त होतो. वैदिक वाङ्मयात पितरांचे सोमवंत, बर्हिषद व अग्निष्वात्त असे तीन प्रकार कल्पिले. स्मृतींत व पुराणांत पितरांचे अनेक वर्ग कल्पिले आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात कर्मसिद्धांताची स्थापना होण्यापूर्वीची ही पितर किंवा पितृलोक संकल्पना असावी.
मनुष्य मेल्यावर कृत कर्मानुसार स्वर्गात वा नरकात वा विविध योनींत जातो. स्वर्गवास वा नरकवास संपल्यावर किंवा मृत्यू झाल्याबरोबर लगेच दुस-या उच्च वा नीच योनीत कर्मानुसार जन्म घेतो, असे कर्मसिद्धांत सांगतो. पितृलोकाची संकल्पनासुद्धा या कर्मसिद्धांताशी नंतर जुळवून घेण्यात आली. पितृलोकप्राप्ती करू न देणारे कर्म म्हणजे ज्ञानरहित यज्ञकर्म होय.